नवाब मलिकांची टीका
मुंबई – देशात मोदींची सत्ता येत नाही याची शंका आल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर नेते विजयसिंह मोहिते-पाटील व कॉंग्रसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचे टाळले, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
अकलूज येथे आज मोदींच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर दिसले. मोदींनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, परंतु त्यांनी भाजप प्रवेश केला नाही. तीच परिस्थिती नगरच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांची आहे. या दोन्ही नेत्यांना आपल्या जागा निवडून येतील का याबाबत विश्वास नाही असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. मोदींचे सरकार येत नाही म्हटल्यावर दोघांनीही आपली मुले भाजपात पाठवली आणि स्वत: मात्र गेले नाहीत. दोघांनाही भाजप पुन्हा सत्तेत येईल का याबाबत शंका असल्याने त्यांनी अशी भूमिका घेतल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.