मंचर – सध्या कांद्याला बारा रुपये ते सोळा रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याने बराकीत साठवलेला कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाळी वातावरणामुळे काही प्रमाणात कांद्याची सड निघत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गतवर्षी पाण्याची कमतरता असतानाही शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले होते. चांगला भाव न मिळाल्यामुळे तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी कांदा बराकीत साठवला होता. आता चांगला भाव आल्यामुळे शेतकऱ्यांनी बराकीत साठवलेला कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी बराकीत साठविलेला कांदा सडून गेल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सध्या शेतकऱ्यांनी कांदा भरणीला सुरुवात केली असून मोठ्या प्रमाणात बराकीत साठवलेला कांदा विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केली आहे. सध्या कांद्याला असलेला बाजारभाव परवडत असल्यामुळे शेतकरी कांदा भरणीच्या कामात गुंतले आहेत. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कांदा भरणी करणे सोपे जात आहे.तसेच जास्त दिवस कांदा साठविला तर सडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची कांदा भरण्यासाठी लगबग सुरू आहे.