नवी दिल्ली – बाऊंसर्स नेमून सक्तीने कर्ज वसुली करण्याचा बॅंकांना अधिकार नाही असे स्पष्टीकरण सरकारने आज संसदेत दिले. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. ते म्हणाले की बॅंकांनी कर्ज वसुलीसाठी एंजट नेमले आहेत. पण काहीं वेळा हे एजंट म्हणजे बळजबरी करणारे बाऊंसर्स असतात. अशांना अनुमती नाहीं. कर्जवसुलीसाठी जे एजंट नेमायचे आहेत त्या विषयी रिजर्व्ह बॅंकेने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार संबंधीत व्यक्तींचे पोलिस व्हेरिफिकेशन करून आणि योग्य ती प्रक्रिया पुर्ण करूनच असे एजंट नेमले जावेत असे ते म्हणाले. कर्ज वसुलीसाठी गुंडांना नेमता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्जवसुलीसाठी थकबाकीदारांना वेळीअवेळी त्रास देण्यासही प्रतिबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. या नियमांचा भंग करणाऱ्या बॅंकांच्या वर कारवाई केली जाईल आणि ज्या बॅंकांच्या कर्जवसुली एजटांनी थकबाकीदारावर बळजबरी केली तर त्या बॅंकेला कर्ज वसुली एजंट नेमण्यास मनाई केली जाणार आहे असेही मंत्र्यांनी यावेळी सांगितले.