लंडन – क्रिकेट विश्वचषक 2019 मध्ये पावसाने बराच उलटफेर करत अनेक समीकरण बिघडवण्यास सुरुवात केली असुन विश्वचषकातील तीन सामने पावसाच्या व्यत्ययाने रद्द केली. ज्यात बांगलादेश आणि श्रीलंका या सामन्याचा देखील समावेश होता. त्यामुळे दोन्ही संघाना 1-1 गुणांवर समाधान मानावे लागले. सामन्याचा अशाप्रकारे निकाल लागल्याने बांगलादेशचे प्रशिक्षक स्टीव्ह रोड्स हे खूपच निराश झाले आहेत. त्यामुळे ते आपल्या रागावर संयम ठेऊ शकले नाही. त्यामुळे यावेळी आयसीसीवर थेट टीकाही केली आहे.
कारण आतापर्यंत पावसामुळे तीन सामने रद्द झाले आहेत. स्टीव्ह यांनी पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यांबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘जर आपण मानवाला चंद्रावर पाठवू शकतो तर मॅचसाठी रिजर्व-डे का ठेऊ शकत नाही?’ मॅच साठी रिजर्व्ह डे ठेवणे हे काही रॉकेट सायन्स नसुन हे इतकेही अवघड नाही असे म्हणत त्यांनी आयसीसीवर टिका केली आहे.
आतापर्यंत या विश्वचषकात तीन वेळेस पावसामुळे सामने रद्द करण्यात आले आहेत. विश्वचषकात पावसामुळे तीन सामने रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी झालेल्या विश्वचषकांमध्ये आतापर्यंत केवळ दोनच वेळा सामने रद्द करावे लागले होते. पण आता तीन सामने रद्द झाल्याने हा देखील विश्वचषकात नवा विक्रम स्थापन झाला आहे. या विश्वचषकात पावसामुळे सामने रद्द होत असल्याने संघांना 1-1 गुण द्यावे लागत आहेत. जे या स्पर्धेच्या शेवटी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.