नवी दिल्ली – दोन हजार रूपयांच्या नोटा म्हणजेच ब्लॅक मनी आहेत. या नोटा जो पर्यंत चलनात आहेत तो पर्यंत ब्लॅक मनी संपणार नाही,त्यामुळे या नोटा बंद करण्याची गरज आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते सुशिलकुमार मोदी यांनी आज राज्यसभेत बोलताना सांगितले.
सन 2016 मध्ये नोटबंदीच्या निर्णयानंतर पाचशे रूपये आणि एक हजार रूपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली. त्याला पर्याय म्हणून दोन हजारांची नोट चलनात आणली गेली होती. पण तो निर्णय चुकीचा ठरला असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच भाजप नेते सुशिलकुमार मोदींच्या वक्तव्यातून दिली गेली आहे. त्यांनी म्हटले आहे की या दोन हजार रूपयांच्या नोटा चलनात कायम ठेवण्याचे आता कोणतेही औचित्य नाही, त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने या नोटा चलनातून काढून घ्याव्यात आणि ब्लॅक मनी निर्माण होण्यापासून वाचवावे अशी मागणी त्यांनी राज्यसभेत केली.
मुळात नोटबंदीचा निर्णय ब्लॅक मनीच्या विरोधात घेतलेला निर्णय होता असे सांगितले जाते. पण हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा रद्द करून त्याऐवजी दोन हजारांच्या नोटा चलनात आणणे हा प्रकार मुळातच चुकीचा असल्याची टीका त्याचवेळी अनेक अर्थतज्ज्ञांनी केली होती.