-माधव विद्वांस
मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे झाला. त्यांचे निधन 18 मे 1846 रोजी वयाच्या 34व्या वर्षीच झाले. अत्यंत अल्पायुषी असलेले बाळशात्री वृत्तपत्रविश्वात मात्र अजरामर झाले. “दर्पण’ हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. त्यांचा जन्मदिन 6 जानेवारी असल्याने हा दिवस ‘पत्रकारदिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
त्यांच्या जन्मानंतर इंग्रज राजवट नुकतीच आली होती. शिक्षणाची दारे उघडण्यास सुरुवात होत होती. अजून लिहिणे वाचणे सामान्य माणसास माहीतही नव्हते. अशा वेळी वर्तमानपत्र काढणे खूप धाडसाचे होते. पोंभुर्ल्यातील घरातच वडिलांकडे संस्कृत भाषेचे ज्ञान त्यांनी घेतले होते.
वयाच्या 13 व्या वर्षीच ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर सदाशिव काशीनाथ ऊर्फ बापू छत्रे यांच्याकडे इंग्रजी व बापूशास्त्री शुक्ल यांजकडे संस्कृतचे अध्ययन केले. बरोबरीने गणिताचाही अभ्यास केला. “बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी वर्ष 1834 मधे प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवली. एवढ्या लहान वयात असे पद मिळविणारे ते पहिले भारतीय होते.
बाळशास्त्रींनी मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराथी, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञानही प्राप्त केले होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला होता. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली. गणित व भविष्य याबरोबरच हवामान, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र यांचाही त्यांचा अभ्यास होता, त्यांच्या प्रकाशित साहित्यामधे नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धिगणित या ग्रंथांचा समावेश आहे.
त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. बाळशास्त्री पुरोगामी विचारांचे होते. पारतंत्र्याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरिती, अज्ञान, दारिद्य्र, भाकड समजुती, जातीयता यामुळे समाजाची प्रगती होत नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. केवळ शाळेत किंवा महाविद्यालयात अध्यापन करून समाज सुधारणार नाही याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे लोकांचे प्रबोधन करण्यासाठी गोविंद विठ्ठल कुंटे ऊर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र काढले.
लोकशिक्षणाचे माध्यम व विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्नाचा दर्पणच्या माध्यमाचा उपयोग करून घेतला. “रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या कार्यात भाग घेण्याचा मान मिळविणारे ते पहिले भारतीय होते. “बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे नेटिव्ह सेक्रेटरी, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापन शाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले. त्यांना वर्ष 1840 मधे “जस्टिस ऑफ पीस’ ही उपाधी सरकारने दिली होती. पत्रकारितेच्या जनकास अभिवादन!