सर्व सहमतीने एक प्रस्ताव होणार मंजूर
पुणे – बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी अंतीम निवड केलेल्या 8 प्रस्तावांचे सादरीकरण 29 मे रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या खास समितीपुढे होणार आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. त्यानंतर हे सादरीकरण होणार असून सर्व सहमतीने त्यातील एक प्रस्ताव मंजूर केला जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडे या संदर्भात 26 प्रस्ताव आले होते. त्यातील 8 प्रस्तावांची अंतीम निवड करण्यात आली आहे. बालगंधर्वंगमंदिराच्या पुनर्वसनासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली 21 सदस्यांच्या समितीसह महापालिका प्रशासनाच्या सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीमध्ये नाट्य, कला, चित्रपट, साहित्य क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने आचारसंहितेपूर्वी 5 ते 7 मार्च या तीन दिवसांत सर्व प्रस्तावांचे सादरीकरण तसेच माहिती घेऊन हे 8 प्रस्ताव अंतीम केले आहेत.
7 सदस्यांच्या समितीकडून छाननी
बालगंधर्व रंगमंदिरांच्या पुनर्विकासासाठी प्रशासनाने नोंदणीकृत वास्तू विशारदांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यात प्रामुख्याने, रंगमंदिराची सध्याची इमारत पाडून त्याठिकाणी प्रचलित डी. सी. रूलनुसार नाट्यगृहाचा समावेश असणारी नवीन इमारत बांधणे. तसेच, सध्याची इमारत कायम ठेवून सध्याच्या नाट्यगृह इमारतीत आवश्यक सुधारणा करणे आणि उर्वरित क्षेत्रावर नव्याने सर्वार्थाने परिपूर्ण अशा रंगमंदिराचा प्रकल्प उभारण्यासाठी डिझाईन सादर करणे अशा बाबी होत्या. त्यानुसार, महापालिकेने दिलेल्या मुदतीत 52 जणांनी या विकसनासाठी प्रशासनास पत्र दिले आहे. मात्र, त्यातील प्रत्यक्षात 26 जणांचेच प्रस्ताव प्राप्त झाले होते. हे सर्व प्रस्ताव महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर न ठेवता त्या प्रस्तावांची पहिल्या टप्प्यातील छाननी महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या 7 सदस्यांच्या समितीने सलग तीन दिवस केली. त्यानंतर 8 प्रस्ताव अंतीम केले गेले.