नवी दिल्ली – समाजवादी पार्टीचे उमेदवार म्हणून वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले सीमा सुरक्षा दलाचे बडतर्फ जवान बहादुर यादव यांचा उमेदवारी अर्जच निवडणूक आयोगाने रद्दबातल ठरवल्याने त्यांनी आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
यादव हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना त्यांनी तेथील जवानांना मिळणाऱ्या निकृष्ठ भोजनाविषयीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला होता.त्यानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मोदींच्या विरोधात वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना समाजवादी पक्षाने अधिकृत उमेदवारही घोषित केले होते.
निवडणूक अर्जासोबत त्यांनी एक अपेक्षित सर्टिफिकेट सादर न केल्याने त्यांचा अर्जच बाद करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सीमा सुरक्षा दलातून आपल्याला भ्रष्टाचार किंवा बंडखोरीच्या कारणावरून बडतर्फ करण्यात आलेले नाही असे सीमा दलाचे सर्टिफिकेट सादर करण्यास त्यांना सांगण्यात आले होते. पण आपल्या बाबतीत करण्यात आलेला अन्याय होता त्यामुळे आपली उमेदवारी कायम ठेवण्यात यावी अशी मागणी त्याने या अर्जात केली आहे.