नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे गेल्याने सरावासाठी आणखी वेळ मिळणार असल्याबद्दल भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्त्विक साईराज रांकीरेड्डी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचवेळी आता लवकरात लवकर प्रशिक्षकाचीही नियुक्ती केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भारतीय बॅडमिंटन संघासाठी इंडोनेशियाच्या प्लान्टी लेम्पेले प्रशिक्षक म्हणून काम पाहात होते. मात्र, त्यांनी कौटुंबिक कारणाने पदाचा राजिनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर लवकरात लवकर नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी असे मत या खेळाडूंनी व्यक्त केले आहे.
लेम्पेले यांची मुदत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत होती. करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्याने लेम्पेले यांनी राजीनामा दिला असून त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती निवळली तर गलेचच प्रशिक्षकाची नियुक्ती व्हावी. तसेच याबाबत मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याशी चर्चा झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.