नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असतानाच मोदी सरकारसाठी एक वाईट बातमी आहे. देशात बेरोजगारीच्या दराने गेल्या अडीच वर्षातील उच्चांक गाठला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील बेरोजगारीचा दर एप्रिलच्या पहिल्या तीन आठवडय़ांत ८.१ टक्के इतका झाला आहे. सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) या संस्थेने बेरोजगारीची ही आकडेवारी दिली आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ७.९ टक्के असणारा बेरोजगारी दर दुसऱ्या आठवड्यात ८.१ टक्के तर तिसऱ्या आठवड्यात ८.४ टक्के असा वाढत गेला आहे. काही दिवसांपूर्वी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) पाच वर्षांत जवळपास दोन कोटी पुरूष बेरोजगार झाल्याचा धक्कादायक खुलासा केला होता.
दरम्यान, मोदी सरकारला बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच सीएमआयईच्या या अहवालामुळे ऐन निवडणुकीत मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.