नवी दिल्ली – औरंगाबादनजीक औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी विकसित करण्यात आली आहे. हे ठिकाण उद्योजकांच्या दृष्टिकोनातून अतिशय सोयीचे आहे. त्यामुळे पुढील बारा वर्षात या सिटीत 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. त्यामुळे दीड लाख रोजगार निर्माण होतील असे औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील यांनी सांगितले.
या संदर्भात वातावरण निर्मिती करण्याकरिता आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमात गुंतवणूकदार आणि उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीत दहा हजार एकर जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील उद्योग या ठिकाणी वाढण्यास वाव आहे.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी संयुक्तपणे निर्मिती केलेली आहे. औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी येथे सर्व बाबी नियोजनबद्धरीत्या विकसित केलेल्या आहेत. या ठिकाणी अगोदरच 52 उद्योगांना जमीन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी एक मोठा प्रकल्प आणि 11 छोटे प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. ही सिटी गुंतवणूकदारांसाठी तयार आहे असे पाटील म्हणाले.
देशातील आणि परदेशातील उद्योग या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. याठिकाणी निर्मिती, जुळवणी, अन्न प्रक्रिया, विक्री कार्यालय विकसित करता येऊ शकणार आहेत. ही सिटी औरंगाबादपासून केवळ पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. तर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे ड्रायपोर्ट येथून केवळ चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे निर्यातदारांना ही जागा सोयीची आहे. जमिनीचे मालक आणि शेतकऱ्यांची परवानगी घेऊन या ठिकाणी जमीन विकसित करण्यात आली आहे. या सिटीतील 60 टक्के भाग उद्योगासाठी आणि 40 टक्के भाग घरे, व्यवसायिक प्रकल्प, संस्था इत्यादी साठी वापरण्यात येणार आहे.