सकल राजस्थायी युवा मंचच्या सायकल रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद
नगर: नगर शहराचा स्थापना दिन आनंदोत्सव म्हणून आपण सर्वजण साजरा करत आहोत. यानिमित्त सर्वत्र उत्साहात विविध उपक्रम राबविले जात आहेत. देश वेगाने बदलत आहे, त्या वेगाने आपले नगर शहरही बदलले पाहिजे, यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. त्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. नगर शहर आता चहुबाजूने वाढत आहे. इतर शहरांच्या मनाने आपलेही शहर सुजलाम, सुफलाम होईल, यासाठी प्रत्येकाने आपल्या शहराबद्दल अभिमान बाळगून काम करावे. सकल राजस्थानी युवा मंचचे सर्व युवक कार्यकर्ते यांनी नगर शहराच्या वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅली सारखा स्त्युत्य उपक्रम राबवून वेगळा पायंडा पाडला आहे. सर्व आयोजकांचे अभिनंदन, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
नगर शहराच्या 529 व्या स्थापना दिनानिमित्त सकल राजस्थानी युवा मंच व महिला मंच तसेच अहमदनगर सायकलिंग क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायकल रॅलीचा प्रारंभ खा.दिलीप गांधी यांच्या हस्ते वाडियापार्क येथून झाला. यावेळी वाहतुक शाखेचे निरिक्षक अविनाश मोरे, जवाहर मुथा, सकल राजस्थानी युवा मंचचे धनेश कोठारी, मर्चंट बॅंक संचालक अमित मुथा, प्रोजेक्ट चेअरमन धनेश खत्ती, सायलिंग क्लबचे गौरव फिरोदिया, मराठा सायकल मार्टचे प्रितम भगवानी आदि उपस्थित होते.
या सायकल रॅलीला विविध क्षेत्रातील नागरिकांसह महिला, मुली, बालकांचा व ज्येष्ठ नागरिकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ही रॅली वाडिया पार्क,शहराच्या मुख्य मार्गे पुन्हा वाडिया पार्क येथे येवून समारोप करण्यात आला.या सायकल रॅलीत पाच वर्षांचे बालक तसेच 84 वर्षांचे अरविंद चन्ना हेही उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. या कार्यक्रमानिमित्त लाभा शाह हीने कॅन्सरच्या रुग्णांकरीता स्वत:चे केस दान केले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात धनेश कोठारी म्हणाले म्हणाले, सकल राजस्थानी युवा मंचा वर्षभर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. स्वच्छता अभियान, वृक्षरोपण व संगोपन यांना प्राधान्य देत आहोत. या उपक्रमांना सर्व वयोगटातील नागरिकांचा, विविध सामाजिक संस्थांचा, उद्योजकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. सायकल रॅलीला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढतच आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सकल राजस्थायी युवा मंचच्या असंख्य सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे प्रसन्न पाठक यांनी केले तर आभार अमित मुथा यांनी मानले.