जालना – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या मध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. जामखेड येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेत बोलताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत, सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काय मागता, त्याऐवजी बॉम्बला बांधून राहुल गांधी यांनाच पाठवायला हवे होते, मग खरं काय ते समजले असते, अशी टीका केली आहे.
पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी आजकाल जो कोणी उठतो तो नरेंद्र मोदींवर बोलतो असे सांगून, हे फक्त वर्तमानपत्रातील बातमीसाठी करत असल्याचे त्या म्हणाल्या. काही लोक सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत, किती लोक यामध्ये मेले याबद्दल शंका उपस्थित करत आहेत. त्यांचा भारतीय सेनादलावर विश्वास नसल्याचे सांगत, अशा लोकांनाच त्या ठिकाणी सोडले पाहिजे, म्हणजे त्यांना कळेल कुठे सर्जिकल स्ट्राईक झाला आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेवरून घाणेरडे राजकारण सुरु असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.