मुंबई – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव झाल्यामुळे संपूर्ण पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत अशोक चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून पराभूत झाले असून, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
संपूर्ण देशात लोकसभेत काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या आहेत. खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे. देशातील अनेक नेते एकापाठोपाठ एक राजीनामे देत आहेत. उत्तर प्रदेशचे प्रभारी राज बब्बर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील राजीनामा दिला आहे.
Ashok Chavan,Maharashtra Congress Chief: I have submitted my resignation & now it’s up to Congress President Rahul Gandhi to take call on whatever reshuffle & changes he wants to make. We fully authorise him to take call on this. I will be meeting Rahul Gandhi soon. (25.05.19) pic.twitter.com/4dzhH0QFd9
— ANI (@ANI) May 26, 2019
वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मी राजीनामा पाठवला असून आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेरबदलासंदर्भातील निर्णय घ्यायचा आहे. यासंदर्भातील निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. तसेच मी लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
तत्पूर्वी, अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांनी राज्यातील अन्य प्रदेशाध्यक्षांनी देखील हीच भूमिका घ्यावी असे सांगितले. जेणेकरून आगामी निवडणुकीत तरुण नेत्यांना संधी देता येईल.