चारा प्रशासनाची कारवाई जुजबी
नगर: दुष्काळी परिस्थित पशुधन वाचविण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात 501 चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये 3 लाख 32 हजार 14 जनावरे असून, या जनावरांना प्रमाणापेक्षा कमी चारा दिला जातो. तसेच पशुखाद्यही 10 ते बारा दिवस मिळून दिले जाते. ते ही निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चारा छावणीचालकांची मनमानी सुरूच असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा आणि पाणी मोफत उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार सहकारी संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या छावणी प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली.
आजमितीस 501 छावण्या सुरू असून, यामध्ये लहान जनावरे 44 हजार 257 आहेत. यासाठी शासनाकडून आता 50 रुपये अनुदान, तर मोठी 2 लाख 87 हजार 757 जनावरे असून, मोठ्या जनावरांसाठी 100 रुपये प्रति (जनावर) अनुदान देण्यात येत आहे. मोठ्या जनावरांसाठी 18 किलो, तर लहान जनावरांसाठी 9 किलो चारा देणे बंधनकारक असूनही अनेक चारा छावण्यांत मोठ्या जनावरास 15 किलो, तर लहान जनावरांना 7 किलो चारा दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दिवसाआड पशुखाद्य 1 किलो देणे बंधनकारक असूनही अनेक चारा छावण्यांत पशुखाद्य दिले जात नाही. तसेच काही चारा छावण्यांत निकृष्ट दर्जाचे पशुखाद्य दिले जाते.
याबाबत काही बोलल्यास चारा छावणीचालकांकडून अरेराविची भाषा केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चारा छावणीचालकांची मनमानी वाढली असून, याकडे ही प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्हा दुष्काळात होरपळत आहे. पाण्याअभावी खरीप हंगाम हाती लागला नाही. परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे रब्बी पिके देखील उगवली गेली नाहीत. डिसेंबर महिन्यापासून चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पशुधन वाचविण्यासाठी मोठे संकट उभे राहिले होते.
महसूल, जिल्हा परिषद पथकाकडून कारवाईचा दिखावा
जनावरांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही, हे पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 7 प्रांताधिकारी, 14 तहसीलदार, तर जिल्हा परिषदेचे 33 अधिकाऱ्यांनी चारा छावण्यांची क्रॉस चेकिंग करण्यासाठी पथकांची नेमणूक करून अचानक छावण्यांची तपासणी केली. मात्र या कारवाईचे काय झाले हे अद्यापही समजू शकले नाही. ही कारवाई दिखावा असल्याचेही शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
…तर होते लाखो रुपयांची बचत
चारा छावणीचालकांनी एक दिवस चारा वाटप केला नाही, तर त्यांचे लाखो रुपयांची बचत होती. तसेच पशुखाद्य निकृष्ट दर्जाचे दिले जाते. चारा छावणी चालक चारा वाटपाची नोंद व पशुखाद्याची नोंदी लावतात. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून ते पैसे मिळणारच आहेत. असा प्रकार बाजार समिती संघाच्या चारा छावण्यामध्ये होत आहे.