नवी दिल्ली – भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी संसदेत बांगलादेशमधून होत असलेल्या घुसखोरीबाबतचा प्रश्न उपस्थित करत कर्नाटक राज्यात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) कायदा लागू करण्याची मागणी केली.
संसदेत शुन्य प्रहरावेळी ते बोलत असताना सुर्या म्हणाले की, हा कायदा कर्नाटकात लागू केल्यास बेंगळूरुमध्ये अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढण्यास सोपे जाईल. तसेच सुर्या पुढे म्हणाले की, घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगलादेशी नागरीकांची संख्या कर्नाटक राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. खासकरून बेंगळूरुमध्ये हे घुसखोर अवैधरित्या वास्तव्य करण्यास प्राधान्य देत आहेत. या नागरिकांमुळे राज्याच्या सुरक्षेला धोका पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आसामप्रमाणेच कर्नाटकातही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) हा कायदा लागू करावा, जेणेकरून घुसखोर बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढण्यास मदत होईल.
काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत एनआरसीला विरोध केल्याबद्दल कॉंग्रेसवर टीक केली होती. मोदींनी म्हटले होते की, भाजपासाठी हा काही राजकीय मुद्दा नाही. आम्ही संपूर्ण निष्ठेने एनआरसी लागू करू, आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत. एनआरसीबरोबर देशाची एकता, अखंडता आणि भावी समृद्धीचा मुद्दा जुडलेला आहे. खासदार तेजस्वी सूर्या हे दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले आहेत. 28 वर्षीय तेजस्वी सूर्या यांनी कॉंग्रेसचे उमेदवार बी के हरिप्रसाद यांचा पराभव केला आहे.