पुणे – बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना येत्या 7 जूनपर्यंत विभागीय मंडळांकडे अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
राज्य मंडळाकडून संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विषयनिहाय गुणासह निकालाची प्रिंट विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करुन घेण्यासाठी एकाच अर्जावर पर्याय अधोरेखित करावयाचा आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना 17 जून पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनासाठीही विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे व सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.
फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी न झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै -ऑगस्ट 2019 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेला प्रविष्ट होणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल व त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी सर्व विभागीय मंडळात समुपदेशक नेमण्यात आलेले आहेत. ही सुविधा सात दिवस कार्यरत राहणार आहे. विभागीय स्तरावर हेल्पलाइनची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.