मुंबई – अनिल अंबानी यांच्या उद्योग समूहावर कर्जाचा मोठा बोजा वाढला आहे. आता अंबानी यांनी कर्ज कमी करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ते मालमत्ता विकत आहेत. त्यामध्ये रस्त्यापासून, रेडिओ स्टेशनचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या मुख्यालयातील इमारतीमधील काही भाग लीज करण्याचे ठरविले असल्याचे वृत्त आले होते.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी आपले नऊ रस्त्याचे प्रकल्प विकून 900 कोटी उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे.
रिलायन्स कॅपिटलकडे सध्या रेडिओ युनिट आहे ते विकून बाराशे कोटी रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांमधील काही भागभांडवल विकून हे 1 हजार 150 कोटी रुपये उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंबानी यांनी त्यांच्यावरील कर्जाविरुद्ध युद्ध सुरू केले आहे गेल्या 14 महिन्यांत 3500 कोटी रुपयांचे कर्ज कमी केले असल्याचे त्यांनी सांगितले होते.
आगामी काळातही जास्तीत जास्त मालमत्ता विकून कर्ज कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे या उद्योग समूहाकडून सूचित करण्यात येत आहे. कारण काही पतमानांकन करणाऱ्या कंपन्यांनी या उद्योग समूहाच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. 2017 मध्ये रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने आपली काही मालमत्ता रिलायन्स जिओ इन्फोकॉम या कंपनीला विकण्याचा प्रयत्न केला होता तो प्रयत्न यशस्वी झाला असता तर मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकला असता. मात्र काही कायदेशीर अडथळे आल्यामुळे तो व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही.