गोंदवले – जाहिरात पाहून लोकांमध्ये अनेक बदल घडतात. असेच बदल गोंदवले खुर्द गावाने केले असून पाणी वाचवा, पाणी अनमोल आहे, अशा जाहिरातीद्वारे सामाजिक संदेश लिहून गोंदवलेतील घरांच्या भिंती लोकांशी बोलू लागल्या आहेत. या संदेशामुळे सर्वांना पाण्याचे महत्व कळू लागले आहे.
सत्यमेव जयते वॉटर कप अंतर्गत गोंदवले खुर्दमध्ये मोठ्या प्रमाणत श्रमदानाच्या कामाला वेग आला आहे. त्याचाच एक भाग नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये गावात असणाऱ्या पडीक घरांच्या दगड माती विटा वाहतुकीला अडथळे करत होते, त्यावर ग्रामसभेत सर्वानुमते निर्णय घेत अशी घरे काढून जागेचे सपाटीकरण करून निघणारे दगड बंधाऱ्याच्या कामासाठी वापरणे, ज्या घरांना रंग दिला नाही अशी घरे रंगवून भिंतींवर सामाजिक संदेश लिहून समाज प्रबोधन करू असे बैठकीत ठरले.
त्यानुसार वर्षानुवर्षे पडीक असणारी अनेक घरे जेसीबीच्या माध्यमातून पडून त्यातील दगड लूज बोर्डर साठी वापरले जाऊ लागले व भिंतीवर सामाजिक संदेश लिहले गेले. याचवेळी रंगसंगतीही सुबक केली असून निळं भोर आकाश आणि ढग काढले असून त्या ढगांना आमच्या गावात थांबा, अशी विनंती करताना दाखवलं आहे. जमिनीतील पाण्याची पातळी संपली म्हणून हॅट पंपाच पाणी गेलं आता श्रमदानाच्या कामाशिवाय पर्याय नाही, अशी मस्त पेंटिंग केली आहेत.
पाण्याबाबत लोक चळवळ उभी केली असून पाणी सर्वांनी जपून वापरणे गरजेचे असल्याचे संदेश दिले आहेत. त्यावर काढलेली चित्रं अतिशय छान असून अडाणी माणसालाही त्यातून अर्थ बोध होत आहे. पाणी वाचवा पाण्याचा वापर जपून करा हे त्यातून समजत आहे. ग्रामपंचायतीची पूर्ण इमारत ढगांच्या चित्रांनी माखवली असून त्यावर पाण्याच्या थेंबांचं चित्र जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं आकर्षण ठरलं आहे. यामुळे भिंतीसुध्दा आता चित्रित होऊन बोलू लागल्या आहेत हे विशेष आहे.