निवडणूक काळामध्ये उमेदवार भ्रष्ट्राचार करून विजयी झाल्यास त्याची निवडणूक रद्द होऊ शकते. मात्र जात, धर्माचा प्रचार केल्यामुळे निवडणूक रद्द झाल्याचे प्रकार गेल्या 64 वर्षांच्या इतिहासात घडलेले आहेत.
पंजाब विधानसभा : 1980 मध्ये पंजाब विधानसभेकरिता निवडणुका झाल्या. एका मतदारसंघातून सज्जन सिंग आणि हरचरण सिंह हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. सज्जन सिंग हे अकाल तख्ताचे उमेदवार म्हणून होते. अकाल तख्त हे शिख धर्माचे सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय स्थान आहे. अकाल तख्ताने असा हुकूमनामा काढला की, सर्व शिखांनी सज्जन सिंग यांना मते द्यावीत. सज्जन सिंग यांनी त्या हुकूमनाम्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली नाही. शेवटी निवडणूक प्रचारात असा भ्रष्टाचार केला म्हणून सज्जन सिंग यांची निवडणूक रद्द करण्यात आली.
शिवसेना : मुंबईतील एका विधानसभेच्या मतदार संघातून डॉ. प्रभू हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे होते. एका जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. प्रभू यांच्याकरिता निवडणूक प्रचाराचे भाषण केले. व्यासपीठावर डॉ. प्रभू होतेच. त्यांनी हिंदुत्वाचा जोरदार प्रचार करून डॉ. प्रभू यांना मते द्यावीत असे जनतेला आवाहन केले. त्यांचे भाषण निवडणूक भ्रष्टाचार या सदराखाली मोडत होते. डॉ. प्रभू यांनी ठाकरे यांच्या धर्माच्या आधारे केलेल्या प्रचाराला विरोध दर्शविला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या आधारे डॉ. प्रभू यांच्या मतांकरिता केलेले आवाहन डॉ. प्रभू यांच्याच संमतीने करण्यात आले असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. पर्यायाने डॉ. प्रभू यांची निवड रद्द ठरविण्यात आली.