नवी दिल्ली -यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आजवरचे स्वत:चे सर्वोच्च संख्याबळ गाठले असले तरी पक्ष तेवढ्यावर समाधान मानणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे अजूनही मोठे लक्ष्य असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्यातून सूचित झाले आहे. पक्षाने शिखर गाठणे अजून बाकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शहा यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी येथे भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत शहा यांनी पदाधिकाऱ्यांसमोर एकप्रकारे आणखी उद्दिष्टे ठेवली. भाजपने राष्ट्रवाद, सुशासन आणि गरिबांचे कल्याण हा अजेंडा राबवला. घवघवीत बहुमताने मोदी सरकारने पुन्हा सुत्रे स्वीकारल्याने त्या अजेंड्याच्या यशावर शिक्कामोर्तब झाले. मागील निवडणुकीत भाजपने ज्या राज्यांत चांगली कामगिरी केली; तेथील वर्चस्व कायम ठेवले. त्याशिवाय, पश्चिम बंगाल, ओडिश, तेलंगण या राज्यांत पक्षाने स्वत:ला आणखी मजबूत केले. त्याच पद्धतीने आगामी काळात पक्षाचा इतर राज्यांतही विस्तार होईल. पश्चिम बंगाल, केरळ यांसारख्या राज्यांत भाजपची सरकारे असतील; तेव्हा खऱ्या अर्थाने पक्ष शिखर गाठेल, असे शहा यांनी नमूद केले.
भाजपला मिळालेला कौल जातीयवाद, घराणेशाही यांच्या विरोधातील आहे. उत्तरप्रदेशात सप-बसप महाआघाडीच्या झालेल्या पीछेहाटीने जातींवर आधारित पक्षांची ताकद हे समीकरण संपुष्टात आणले, असे मतही त्यांनी व्यक्त केले.