नवी दिल्ली – भारताला आम्ही परवडणाऱ्या दरात इंधन पुरवठा करण्याबरोबरच त्यांचा उर्जा संरक्षक बनायला आम्ही तयार आहोत. सध्या भारत जरी अमेरिकेच्या दबावाखाली असला तरी भारत हा इराणचा सच्चा मित्र आहे असे विधान इराणचे भारतातील राजदूत अली चेगिनी यांनी केले आहे.
अमेरिकी निर्बंधांमुळे भारताने इराणकडून तेल आयात थांबवली आहे. त्यातच भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी भारताला तेलाची कमतरता भासू देणार नाही त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर इराणच्या राजदूतांनी व्यक्त केलेले हे मत महत्वपूर्ण आहे. माइक पॉम्पियो यांच्या बरोबरच्या भेटीचा दाखला देऊन चेगेनी म्हणाले की, जयशंकर तेलाची किंमत, उपलब्धता आणि सुरक्षेविषयी बोलत असतील तर इराण भारताच्या या सर्व अपेक्षा पूर्ण करु शकतो. भारताने तेल आयात थांबवली असली तरी कोणतेही नकारात्मक संकेत दिलेले नाहीत असे चेगेनी यांनी सांगितले.
भारत आमचा कायमस्वरुपी मित्र असून आपल्या राष्ट्रीय हितानुसार भारत कृती करेल. भारत दबावाखाली असला तरी तो इराणचा मित्र आहे असे अली चेगेनी म्हणाले. भारताच्या दुसऱ्या देशांबरोबरच्या संबंधांमुळे आमचे संबंध बिघडणार नाही असे त्यांनी सांगितले. अमेरिकी निर्बंधांना प्रभावहीन करण्यासाठी भारत आणि अन्य देशांबरोबर तेलाच्या व्यापारात वस्तु विनिमय, रुपये आणि युरोपियन तंत्राचा वापर करण्याची शक्यता अली चेगेनी यांनी व्यक्त केली. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे.