अशोकनगर: भाजपकडून हवालामार्गे मतदारांना पैशांचे वाटप केले जात आहे. मात्र, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा त्याबाबत काहीच कारवाई करत नाहीत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला.
एका सभेत बोलताना ममतांनी भाजपला लक्ष्य केले. भाजपकडून झेड प्लस दर्जाच्या सुरक्षाव्यवस्थेत पैसे आणले जातात. नंतर हवालामार्गे त्यांचे हस्तांतरण होते. त्याबाबत कुठल्याच यंत्रणेकडून कारवाई न होण्याची बाब चकित करणारी आहे. त्यामुळे आपणच दक्ष राहणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरमधून जिथे उतरतात; तिथे कुठल्याच पत्रकाराला जाऊ दिले जात नाही. तसे का, असा सवालही त्यांनी केला. मोदी पश्चिम बंगालमध्ये खूप सभा घेत आहेत. त्यावरून तृणमूलचा वरचष्मा स्पष्ट होतो. आम्हाला राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 42 जागा मिळतील, असा दावा ममतांनी केला. दरम्यान, भाजपने पैसे वाटपाबाबत ममतांनी केलेला आरोप फेटाळून लावला. आम्ही नव्हे; तर तृणूमलचे मंत्री आणि नेते पैसे वाटप करत आहेत, असा प्रत्यारोप भाजपकडून करण्यात आला.