कोपरगाव – संजीवनी फाउंडेशन व संजीवनी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असणारे सामाजिक उपक्रम अधिक व्यापक प्रमाणावर वाढवून तालुक्यातील युवकांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य तसेच सामाजीक विकास हाच भविष्यातील कामाचा ध्यास राहील, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व श्री. साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांचे वाढदिवसानिमित्तिाने संजीवनी फाउंडेशनच्या वतीने संजीवनी शैक्षणिक संकुलात रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे उपक्रम राबविण्यात आले. सदर उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी सुमित कोल्हे बोलत होते.
रक्तदान शिबिरादरम्यान संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी भेटी देऊन रक्तदात्यांची काळजी घेतली. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सर्व संस्थांच्या प्राचार्यांनीही रक्तदान शिबिरादरम्यान भेटी देऊन रक्तदात्यांची विचारपुस केली तर वृक्षारोपणातही सहभाग नोंदविला.
सुमित कोल्हे म्हणाले, समाजाप्रती उत्तरदायित्व आणि युवकांचा सर्वांगिण विकास हाच संजीवनी फाऊंडेशनचा ध्यास आहे. या अनुषंगाने संजीवनी फाऊंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे आयोजीत करून सुमारे 8000 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले आहे. स्वच्छ भारत अभियान, रोजगार शिबीरे, ई-बसच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील सुमारे 3000 विध्यार्थ्यांना संगणक साक्षर करणे, इत्यादी समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहे.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा, राज्यस्तरीय क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर जनसामान्यांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या संस्कारातून समाजाप्रती व खासकरून नवीन पिढीच्या उत्कर्षासासाठी संजीवनी फाऊंडेशनची यापुढे भुमिका राहील. तालुक्यातील युवकांना कोणत्याही अडचणींना खंबीरपणे तोंड देण्यासाठी पाठबळ दिले जाईल.