आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे मंदिरातून मंगळवारी (दि.25) प्रस्थान होत आहे. यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतास माऊली मंदिर व आळंदी संस्थानमध्ये तयारी करण्यात आली आहे. यात भाविक, नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले असून भाविकांच्या स्वागतासाठी आळंदी सज्ज असल्याचे संस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी सांगितले. देवस्थानच्या वतीने तात्पुरती दर्शनबारी उभारण्यात आली आहे. मात्र, दर्शनबारी खुली असून पाऊस जर आला तर भाविकांना भिजावे लागले. आळंदीतील दर्शनबारीचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आळंदीत प्रस्थान सोहळा दरम्यान भाविकांना सुविधा तसेच सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानने तयारी केली असून याचा आढावा घेतला आहे. संस्थान व्यवस्थापनाने भाविकांचे स्वागतास तयारी पूर्ण केली आहे. सोहळ्याच्या प्रथा परंपरा कायम ठेवत तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले. भाविकांसाठी दर्शनबारी उभारण्याचे काम सुरू आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींचे नियोजन करण्यास सूचना देण्यात आल्या आहेत.