मुंबई – राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान आज अकोल्यात नोंदवण्यात आले. आज अकोल्याचे तापमान 47.2 अंश नोंदवण्यात आले आहे. तर वर्ध्यातही तापमानाचा पारा 45.7 अंशावर पोहोचला आहे. वाशिम जिल्ह्यातील कांरंजामध्येही 47 अंशाचा पारा तापमानाने गाठला आहे.
अकोल्यात काल शनिवारी 46.7 अंश, तर वाशिम आणि परभणीमध्ये 45 अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती, तर किमान तापमान 25 अंश कोल्हापुरात नोंदवण्यात आले. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मात्र असे असूनही कोल्हापूर आणि चंदगडला अवकाळी पावसाने झोडपून काढले.
कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या गारपीटीमुळे आणि पावसामुळे काजू, आंबे अशा फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.