अ.भा. विद्यार्थी परिषदेचा एआयसीटीइ ला इशारा
पुणे – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांना अभियांत्रिकी तृतीय वर्ष प्रवेशासाठी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा 20 टक्के कोटा पूर्ववत करावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी दिला आहे.
विद्यार्थी परिषदेतर्फे आपल्या निवेदनात म्हटले आहे की डिप्लोमाच्या ज्या विद्यार्थ्यांनी सध्या द्वितीय व तृतीय वर्षाची परीक्षा दिली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना 20% द्वितीय वर्षाचा प्रवेश कोटा बहाल करण्यात यावा. ज्यावेळी 2016-17 या वर्षाच्या बॅचने प्रथम वर्षाला प्रवेश घेतला, त्यावेळी त्यांना द्वितीय वर्ष प्रवेशासाठी 20 टक्के कोटा देण्यात येईल असा नियम होता. त्या कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांनी डिप्लोमा प्रवेशाला प्रवेश घेतला होता. पण ऐनवेळी प्रवेश कोटा 10 टक्के केल्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना नको असलेल्या महाविद्यालयात आता प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा अ.भा.विद्यार्थी परिषद संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा देत आहे असे या निवेदनात म्हटले आहे.