वर्धा – राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची विकेट काढली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर केली. मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून पहिली सभा वर्धा येथे सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी सुरुवातीला एमीसॅट आणि २७ नॅनो उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.
मोदी म्हणाले कि, मला आशीर्वाद देण्यासाठी जमलेली लोकांची गर्दी पाहून आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झोप लागणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरु असून अजित पवारांनी शरद पवारांची विकेट काढली आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच शरद पवार देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवारांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण हवा कुठल्या दिशेने वाहते हे शरद पवारांना माहित आहे म्हणूनच त्यांनी निवडणूक न लढवण्याच निर्णय घेतला आहे, असे टीकास्त्र त्यांनी पवार कुटुंबियांवर सोडले.
एवढेच नव्हे तर अजित पवारांच्या वादग्रस्त विधानाचा उल्लेख नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केला. ते म्हणाले की, विसरु नका, जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी अजित पवार यांना धरणातील पाण्यासंदर्भात प्रश्न विचारायला गेले असता, त्यांना काय उत्तर दिले? त्यांना असे उत्तर दिले की, जे मी बोलूही शकत नाही.
ज्यावेळी मावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी लढत होते, त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश देण्यात आला. शरद पवार स्वत: शेतकरी असूनही शेतकऱ्यांना विसरले, त्यांच्या कार्यकाळात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण शरद पवार यांनी कोणचीच पर्वा केली नाही, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.