मुंबई – भारतीय संघाने अनेकदा दौरा करुनही जेव्हा जेव्हा संघ इंग्लंडचा दौरा केला आहे तो प्रत्येक दौरा खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरलेला आहे. गेल्या दीड वर्षांपासून भारतीय संघ सरस कामगिरी करत असून येत्या काळात होणारा इंग्लंडचा दौरा यंदा भारतासाठी चांगला ठरेल असा विश्वास भारतीय संघाचा कसोटीपटू अजिंक्य रहाणे याने व्यक्त केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये रहाणेची भारताबाहेरची कामगिरी चांगली राहिलेली आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये त्याने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावलेली आहे. रोहित शर्मा, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली हे दिग्गज फलंदाज संघात असले तरीही रहाणेची कामगिरी या सर्वांपेक्षाही गेल्या वर्षापासून सरस झालेली आहे. अन्य देशांतील मलिकांपेक्षा इंग्लंडमधील कामगिरी जास्त मोलाची ठरते. आता पुढील काळात इंग्लंड दौरा संघासाठी महत्त्वाचा आहेच पण तेथील आव्हानाचा यशस्वी मुकाबला करुन यश मिळविण्यासाठी मी खूप आशावादी आहे, असेही रहाणेने व्यक्त केले.
भारतात करोनाच्या धोक्यामुळे आयपीएलसह सर्व क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. आयपीएलचा तेरावा हंगामही बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.
भारतासह जगभरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. करोनावर अद्याप रामबाण औषध उपलब्ध झालेले नाही, त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात कधी येईल हे देखील कोणी सांगू शकत नाही.
अँडरसन निर्णायक ठरतो
इंग्लंमध्ये लहरी हवामान असते. त्या वातावरणाशी जुळवून घेणे सर्व संघांसाठी आव्हानात्मकच असते. त्यातही त्यांचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचा सामना करणे खूप कठिण ठरते. तेथिल वातावरण मुळातच वेगवान गोलंदाजांसाठी पुरक असते, त्याचा अचूक टप्पा, वेग व सातत्याने स्विंग गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता यांचा सामना करणे सर्वात मोठे आव्हान असते.