नगर: आगामी दोन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होवू घातल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे. गेल्या वेळी पक्षाने राज्यात 122 जागा जिंकल्या होत्या त्याच बरोबर ज्या जागा जिंकता आल्या नाहीत त्या जागांवर आता पक्ष लक्ष केंद्रित करणार आहोत. राज्यात पुन्हा भाजपचीच सत्त येईल अशी माहीती महाराष्ट्राच्या प्रभारी खा. सरोज पांडे यांनी दिली.
पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी आज त्या नगरला आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला जे अभूतपूर्व यश मिळाले त्यात मोदींचे नेतृत्व,पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे संघटन कौशल्य आणि पक्षाच्या विस्तारकाच्या प्रचारातील सहभागाचा मोठा वाटा आहे. राज्यात चार हजार विस्तारक गेल्या दोन वर्षापासून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. राज्यात पक्षाला चांगलं वातावरण असून आजपासून जिल्हानिहाय बैठकांना सुरवात होत आहे.
भारतीय जनता पक्ष लोकांच्या मनातील आकांक्षापूर्ती करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असून नुकताच महिला अर्थमंत्र्यांनी लोकसभेत बजेट मांडतांना आगामी काळातील अर्थव्यवस्थेची रुपरेषा सांगितली आहे. तसेच राज्यातील सरकारनेही लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. मोदींना पंतप्रधान म्हणून गेल्या 5 वर्षातील कामांमुळे लोक ओळखतात.अन्य पक्षातील नेत्यांनाही त्यांच्यापक्षात भविष्य नसल्याने आणि आम्ही राष्ट्रहिताचा विचार करत असल्याने ते आमच्याकडे येवू इच्छितात त्यांचे आम्हीही मनापासून स्वागत करू.आमच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचविली की नाही हे पाहण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत आमच्या बूथ कार्यकर्त्याशी समोरासमोर चर्चा करणार आहोत.
इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांचे अतिक्रमण होणार नाही याची आम्ही काळजी घेवू तसेच सेना दिर्घ काळापासून आमच्या बरोबर आहे यापुढेही राहू जिथे पक्षाचा उमेदवार आहे तिथे तो निवडून आणू जिथे युतीचा उमेदवार असेल तिथे युतीसाठी मनापासून काम करू मात्र कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असेही खा.सरोज पांडे म्हणाल्या.17 राज्यात भाजपला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली तर 18 राज्यात कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. कॉंग्रेसपक्षाचा मोठा कालावधी गांधी घराण्याच्या नावावर सत्ता मिळविण्यात गेला .मात्र आता लोकांना नावा बरोबरच चारित्र्य सुद्धा हवे आहे म्हणून नागरिक मोदींच्या बरोबर आहेत.म्हणूनच आगामी निवडणूकीतही भाजपचीच सत्ता येईल अशी आम्हाला खात्री आहे.
तात्कालिक निर्णयांमुळे भवितव्य संपत नाही
खा. गांधी यांच्या भवितव्याबद्दल बोलताना तात्कालिक निर्णय घेतल्याने कोणाचेही भवितव्य संपत नाही आणि भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता नुसता कार्यकर्ता नसतो तर तो परिवाराचा सदस्य असतो, असे खा. सरोज पांडे म्हणाल्या.