अविनाश कोल्हे
सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाच्या झगमगाटात लोकसभेबरोबर आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांची तितकीशी चर्चा झाली नाही. आंध्र प्रदेशातील जनतेने एका बाजूला चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाला तर नाकारलेच तर दुसरीकडे भाजप व कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनासुद्धा नाकारले. या तीन राजकीय शक्तींना नाकारत तेथील जनतेने जगनमोहन रेड्डी या तरुण व्यक्तीच्या पक्षाला यश दिले.
जगमोहन ऊर्फ जगन रेड्डी म्हणजे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते कै. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे सुपुत्र. मुख्यमंत्रीपदी असलेल्या राजशेखर रेड्डी यांचे 9 सप्टेंबर 2009 रोजी अपघाती निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे ही जगन रेड्डींची मागणी कॉंग्रेसने नाकारली. शेवटी जगनने “वाय.एस.आर. कॉंग्रेस’ हा पक्ष स्थापन केला. राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर कॉंग्रेसचे आंध्रात पतन झाले व चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आता त्याच नायडूंच्या तेलुगू देसमचा दारुण पराभव करत जगन रेड्डींनी दिमाखात सत्ता मिळवली आहे.
आंध्र प्रदेशच्या विधानसभेत एकूण 175 जागा असतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकांत जगन रेड्डींच्या पक्षाने तब्बल 151 जागा जिंकल्या आहेत. 2011 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत जगन रेड्डींच्या पक्षाने 44 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा चंद्राबाबूंच्या पक्षाचे 126 आमदार निवडून आले होते. आताच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाचे फक्त 23 आमदार आहेत. याचाच अर्थ असा की त्यांच्या पक्षाने शंभर मतदारसंघात पराभव पत्करला आहे. जगन रेड्डींच्या पक्षाने 49.9 टक्के मतं मिळवली आहेत. पवन कल्याण यांच्या “जनसेना’ या पक्षाने एक जागा जिंकली आहे. भाजप व कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांना एकही जागा जिंकता आलेली नाही.
राजशेखर रेड्डी 2004 ते 2009 पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यांचा लोकसंपर्क दांडगा होता, प्रशासनावर पकड होती. त्यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्यासारखा नेता कॉंग्रेसमध्ये समोर आलाच नाही. त्या तुलनेत चंद्राबाबू नायडू हे अनुभवी नेते होते. परिणामी जनतेने 2011 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत त्यांच्या तेलुगू देसम पक्षाला यश दिले होते. जगन रेड्डींनी 2019 सालातील विधानसभा व त्याबरोबर झालेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान सर्व राज्य पिंजून काढले. 2018 ते 2019 दरम्यान त्यांनी 241 दिवसांची प्रजा संपर्क यात्रा काढली होती. त्यांनी राज्यांत 3647 कि.मी.प्रवास करताना एक कोटी जनतेशी संवाद साधला होता. याच दरम्यान त्यांना दर शुक्रवारी हैदराबादेतील विशेष न्यायालयात बेहिशेबी मालमत्तेबद्दलच्या खटल्यात हजेरी लावावी लागत असे. हा सर्व प्रचार जगन रेड्डींनी फार मन लावून केला.
आंध्र प्रदेशातून लोकसभेसाठी 25 खासदार निवडले जातात. यातील रेड्डींच्या पक्षाने 22 जागा जिंकल्या.
एके काळी महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेशही कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. तेथे अनेक वर्षे कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. याला 1980 च्या दशकात घरघर लागली. हा काळ म्हणजे श्रीमती इंदिरा गांधीच्या पुनरागमनाचा काळ होता. जानेवारी 1980 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर राजीव गांधींनी राजकारण प्रवेश केला व लवकर उद्याचे पंतप्रधान म्हणून वावरू लागले. त्याकाळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री टी. अंजैय्या होते. ते राजीव गांधींना घ्यायला हैदराबाद विमानतळावर गेले. तेव्हा घडलेल्या एका घटनेमुळे सर्व आंध्र प्रदेशात संतापाची लाट उसळली. याचा फायदा सिनेनट एन. टी. रामा राव यांना मिळाला. त्यांनी स्थापन केलेल्या तेलुगू देसम पक्षाची लोकप्रियता शिगेला पोहोचली.
एवढेच नव्हे तर 1983 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत तेलुगू देसम दणदणीत बहुमताने निवडून आला. त्यावेळी एकूण 294 जागांपैकी तेलुगू देसमने 201 जागा जिंकल्या होत्या. यामुळे तेथे असलेल्या कॉंग्रेसच्या मक्तेदारीला धक्का लागला तो कायमचा. आता तर कॉंग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. तसे पाहिले तर चंद्राबाबू नायडू अनुभवी नेते आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात हैदराबाद म्हणजे देशाचे “सायबर कॅपिटल’ ओळखले जात होते. अलिकडे त्यांचे भाजपाशी वाद झाले ते राज्याला विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून. यामुळे नायडू भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले व भाजपाच्या विरोधात जोरदार प्रचार करू लागले. एका टप्प्यावर तर त्यांनी “बिगर भाजपा बिगर कॉंग्रेस’ आघाडी उभी करण्याचे जोरदार प्रयत्न केले. नायडूंच्या प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या हातातून राज्याची सत्ता गेलेली आहे.
चंद्राबाबूंप्रमाणेच जगन रेड्डींचीसुद्धा आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी आहे. सत्तारूढ होताच जगन रेड्डींनी या मागणीचा पुनरूच्चार केला. विधानसभा निवडणुकांत नेत्रदीपक यश मिळाल्याबरोबर व मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याअगोदर ते दिल्लीत जाऊन मोदीजींना भेटले. ज्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच दिवशी मोदीजींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. जगन रेड्डींच्या दुर्दैवाने आंध्र प्रदेश सरकारचे विमान उतरायला दिल्ली विमानतळावर जागा नसल्यामुळे ते मोदीजींच्या शपथविधीला उपस्थित राहू शकले नाही. अर्थात आज अशी स्थिती आहे की भाजपाने स्वबळावरच 303 खासदार निवडून आणल्यामुळे त्यांना कोणाच्या पाठिंब्याची गरजच नाही. परिणामी आतापासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांत चुळबूळ सुरू झाली आहे. आताच्या नव्या परिस्थितीत मोदी-शहा यांचे नेतृत्व घटक पक्षांना किती मानसन्मानाने वागवतील याबद्दल प्रश्नचिन्हच आहे. अशा स्थितीत जगन रेड्डींसारख्या तरुण मुख्यमंत्र्यांचे काय स्थान आहे, हे लवकरच दिसेल.
भारतीय व्यवस्थेत होत असलेले हे बदल दूरगामी परिणाम करणारे आहेत. या बदलांच्या संदर्भात काही निरिक्षणे नोंदवणे गरजेचे आहे. तामिळनाडूप्रमाणेच आता आंध्र प्रदेशातही प्रादेशिक पक्षांचे राजकारण स्थिरावले आहे. तेथे आता एका बाजूला चंद्राबाबू नायडू आहेत तर दुसरीकडे जगन रेड्डी आहेत. यात भाजप काय किंवा कॉंग्रेस, या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना काहीही स्थान नाही. जगन रेड्डींनी सत्ता स्वीकारल्याबरोबर नायडू मुख्यमंत्री असतांना दिलेल्या मोठमोठ्या कंत्राटांची चौकशी केली जाईल असे जाहीर केले आहे. आज चंद्राबाबू नायडू मागे पडलेले दिसत असले तरी तसे ते राहणार नाही. राजकारणातले, त्यातही निवडणुकांतले यश पाहिले तर तात्पुरते असते. चंद्राबाबूंचा पक्ष लवकरच या धक्क्यातून बाहेर पडेल.