पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा
सखल भागात पाणी साचले
मुंबई : मुंबई आणि परिसरात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. रात्री झालेल्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यादरम्यान, हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे टिळक नगगर, अंधेरी पूर्वेकडील मरोळ, सातबाग, परळमधील हिंदमाता, सायन, सायन रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साचले आहे. गुघड्याभर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मुंबई आणि परिसरात पुढील दोन कोसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुलाबा परिसरात 171 मिमी पाऊस तर सांताक्रूझ परिसरात 58 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईच्या तुलनेत राज्यातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी अती जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून दमदार हजेरी लावली. दरम्यान, पावसाचा जोर कायम असला तरीही रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहेत. तिन्ही रेल्वे मार्गावर कोणताही परिणाम झालेला नाही.