नवी दिल्ली – भाजपचे जेष्ठ नेते राम माधव यांनी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसतर्फे सुरु असलेल्या निवडणूक आयोग व ईव्हीएमवरील आरोपांवर तिखट निशाणा साधला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी याबाबत बोलताना राम माधव यांनी काँग्रेसच्या भूमिकेबाबत वक्तव्य केलं असून ते म्हणतात, “देशातील जनतेला पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करायचे आहे. निवडणुकांच्या निकालांनंतर आम्ही आमच्या मित्र पक्षांसोबत एक भक्कम सरकार स्थापन करणार आहोत. उद्या मतदानानंतर काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागणार असून यामुळेच ते आपल्या पराभवाचे खापर इतरांवर फोडण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. या आधी काँग्रेसने निवडणूक आयोगावर आरोप लावले त्यानंतर त्यांनी एव्हीएमवर आरोप लावायला सुरुवात केली. येणाऱ्या काळात काँग्रेस आपल्या पराभवासाठी मतदारांवर आरोप लावायला देखील मागे पुढे पाहणार नाही.”
दरम्यान, उद्या देशभरामध्ये सात टप्प्यांमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असून निकालांपूर्वीच काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्षांनी एव्हीएमची अनधिकृत वाहतूक केल्याचा आरोप लावत एव्हीएममध्ये फेरफार झाली असल्याचा दावा निवडणूक आयोगासमोर केला आहे. मात्र निवडणूक आयोगाने विरोधकांच्या दाव्यांना सपशेल नाकारलं आहे.
Ram Madhav, BJP: People want Modi ji back as PM, we'll form a strong govt again, together with our NDA partners. They (Congress) are looking for excuses for their impending defeat tomorrow, they have blamed EC, now they are blaming EVMs, tomorrow they'll start blaming voters also pic.twitter.com/y5MKaMG9ZS
— ANI (@ANI) May 22, 2019