लंडन – विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापुर्वी संभाव्य विजेता समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला साखळी फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर संघातील खेळाडू आपली नाराजी व्यक्त करत असताना आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने संघाने या अपयशातून धडा घेत भविष्याअच्या दृष्टीने तयारी करायला हवी अशी सुचना केली आहे.
यावेळी पुढे बोलताना रबाडा म्हणाला, यंदाच्या विश्वचषकात आम्ही खराब कामगिरी केली. काही सामन्यांत आम्ही दुर्दैवीसुद्धा ठरलो. परंतु या विश्वचषकाने आम्हाला भरपूर शिकवले, त्यामुळेच क्रिकेट हा विश्वातील सर्वोत्कृष्ट खेळ आहे. विश्वचषकाच्या पराभवातून सावरण्यासाठी माझ्यासह आणखी काही खेळाडूंना नक्कीच वेळ लागेल. मात्र आता आम्ही झाले ते विसरून नव्याने संघबांधणी करण्यावर भर देणार आहोत. 2020च्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने आतापासूनच सकारात्मक दृष्टिकोन बाळगून मेहनत घेण्याची गरज आहे,” असेही रबाडाने सांगितले.
आयपीएलचा विश्वचषकाच्या तयारीवर परिणाम पडला का, असे विचारले असता रबाडा म्हणाला, आयपीएलमुळे मला माझ्या गोलंदाजीवर मेहनत घेता आली. तिथे मी 25 बळी मिळवले. त्या तुलनेत विश्वचषकात मी साधारण कामगिरी केली. त्यामुळे आयपीएलला विश्वचषकातील सुमार कामगिरीसाठी दोष देणे मूर्खपणाचे ठरेल असेही त्याने नमूद केले.