नंदुरबार – अवजड सामान वाहून आणण्याचे काम वर्षांनुवर्षे गाढवं करतात पण माणसांना पाणी पाजण्यासाठी गाढवं कामी येत असल्याचं कधी ऐकल का. पण नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम कुयरीडाबर पाड्यावर दुष्काळामुळं पाण्याची तीव्र टंचाई आहे. आदिवासी भागातील कुयरीडाबर (ता. तळोदा) गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तेथील ग्रामस्थांना पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाने गाढवांची मदत घेतली आहे.
राज्यात यंदा भीषण दुष्काळ असल्याने अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हासुध्दा याला अपवाद नाही. यंदा नंदुरबारमध्ये जिल्ह्यातील डोंगररांगांत वसलेल्या बहुतेक पाड्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यापैकीच एक पाडा म्हणजे कुयरीडाबर होय. कुयरीडाबर हे सातपुड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या रांगेदरम्यान वसलेले गाव. गावाची लोकसंख्या ३१० आहे. रापापूरपर्यंत डांबरी रस्ता आहे. तेथून मात्र पायीच उंच डोंगर चढून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या पाड्यावर तीन विहिरी आहेत. परंतु गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यानं यंदा प्रथमच येथील विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे पाड्यावरील अनेक कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ग्रामस्थानी याबदल प्रशासनाकडे मदत मागितली.
प्रशासनाने याची दखल घेत तहसीलदार पंकज लोखंडे यांनी या भाड्याला भेट दिली. डोंगररांगांत वसलेल्या पाड्यावर वाहन येण शक्य नसल्याने आणि टंचाईची तीव्रता पहाता तत्काळ गाढवांच्या पाठीवरून पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेत ग्रामस्थांच्या पाणीप्रश्न मार्गी लावला, त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. महत्वाचे म्हणजे या पाड्यावर पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पोहचलेले पंकज लोखंडे हे पहिलेच महसूल विभागाचे अधिकारी आहेत.
पाणी पुरवठ्यासाठी १७ गाढव भाड्याने घेण्यात आले आहेत. गाढवांना ने-आण करण्यासाठी पाच मजूर आहेत. गाढवाच्या पाठीवर १५ लीटर पाण्याचे दोन ड्रम ठेवली जातात. तब्बल दोन तासानंतर ते कुयरीडाबरला पोहोचतात. प्रत्येक घरासाठी एक ड्रम दिला जातो.
एका गाढवाला एका फेरीसाठी ७५ रुपयांची मजुरी दिली जाते तर गाढव ने-आण करणाºया पाच मजुरांना प्रत्येकी २०० रुपये मजुरी दिली जाते. यांचा खर्च हा रापापूर ग्रामपंचायत देणार आहे. यासाठी खर्चाचा रीतसर प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठवून कायदेशी मंजुरीही घेतली जाणार आहे.