नवी दिल्ली : ‘मोदी-2′ सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (५ जुलै) लोकसभेमध्ये सादर केला. त्यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र या बजेट मुळे निराशा झाली आहे. सरकारच्या या बजेट मुळे काही गोष्टींवर कर वाढवले तर, काही गोष्टी करमुक्त केल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, आजच्या या बजेट बद्दल भाजप नेत्यांनी सकारात्मक तर विरोधकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प “नव भारता’साठी आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख भारताची पायभरणी केली गेली आहे. देशातील शेतकरी, युवक, महिला आणि गरिबांना आपली स्वप्ने साकारण्यासाठी पंख प्राप्त झाले आहेत. सर्व अर्थकारण, गृहउद्योग, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या 5 वर्षातल्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख अर्थसंकल्पामध्ये अहे. स्वच्छ उर्जा आणि कॅशलेस व्यवहारांवर विशेष भर देण्यात आला असून हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे.
– अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष,
“हा अर्थसंकल्प म्हणजे पूर्वी केलेल्या आश्वासनांचीच पुनरावृत्ती आहे. या अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून कोणतीही नवीन कल्पना मांडण्यात आलेली नाही. भाजपकडून नवभारताबाबत बोलले जाते आहे. मात्र हा अर्थसंकल्प म्हणजे जूनीच दारु नव्या बाटलीत भरून दिली आहे. रोजगार निर्मिती, जिल्हा पातळीवर कृषी क्षेत्रासाठीच्या सुविधा, श्रमिक क्षेत्र याचाही अर्थसंकल्पात उल्लेख नाही.
-अधिर रंजन चौधरी, लोकसभेतील कॉंग्रेस नेते
तरतूदींची कमतरता असलेले, तपशील नसलेले, प्रेरणा शून्य आणि दिशाहीन अर्थसंकल्प आहे. अर्थकारण पुनरुज्जीवित करण्यास, ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती, शहरांना नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प “झिरो’ आहे. नवभारताच्या नावाने केवळ शाब्दिक भपकेबाजी करण्यात आली आहे.
-कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला