श्रीगोंदा -वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील कामठी गाव अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी दत्तक घेतले आहे. या गावातील जलसंधारणासाठी तिने दहा लाखांची मदत केली असून, या कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले.
डोंगर दऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेले मांडवगणजवळील कामठी हे गाव. दुष्काळ मुक्त करून गाव सुजलाम सुफलाम करण्यासाठी कोणीतरी सहकार्य करावे, ही कामठी गावकऱ्यांची भावना होती. गावऱ्यांची ही इच्छा दिपाली सय्यद यांनी पूर्ण केली. कामठी गाव दत्तक घेऊन आदर्श व समृद्ध गाव करण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले आहे.
सय्यद यांनी नुकतीच कामठी येथे भेट देऊन गावाची पाहणी केलो. गावातील छावणी, प्राथमिक शाळा, हायस्कूलला भेट देऊन शेतकरी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गावातील जलसंधारणाच्या कामासाठी तिने दहा लाखांची मदत तर केलीच शिवाय या कामाचे भूमिपूजन करून या कार्यास प्रारंभ ही केला.
उद्योजक विमलबाई पटेल, सह्याद्री मल्टीस्टेटचे अध्यक्ष संदीप थोरात, भाऊसाहेब शिंदे, सरपंच जनाताई आरडे, देविदास चेमटे, दत्तात्रय शिंदे, परशुराम शिंदे, दादासाहेब आरडे, अजिनाथ शिंदे, संजय कळमकर, शीतल कारले, सुनीता शिंदे, लंकाबाई शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.