पालक सचिव आशिषकुमार सिंह : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
नगर – नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पाणी, जनावरांना चारा व मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्या, असा आदेश पालक सचिव आशिषकुमार सिंह यांनी दिले. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरला जीपीएस सिस्टिम अनिवार्य असून, त्यानुसारच टॅंकरची बिले मंजूर करण्यात येणार आहेत. चारा छावण्यातील जनावरांना टॅगिंग असेल, तरच शासनाच्या आदेशानुसार अनुदान वर्ग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पाणीटंचाई व दुष्काळ निवारणाच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा पालक सचिव आशिषकुमार सिंह यांनी घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पर्जन्यमान, प्रकल्पातील पाणीसाठा, पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा, टॅंकर, विहिरींचे अधिग्रहण, पाणीपुरवठा, चारा छावणी आदींबाबत प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती सिंह यांनी घेतली.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, अशा परिस्थितीत मजुरांना त्यांच्या गावातच काम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ज्या गावांतून कामांची मागणी असेल, त्या गावातील मजुरांना तातडीने कामे उपलब्ध करून द्या. रोजगार हमी योजने अंतर्गत जास्तीत जास्त कामे सुरू करा, तीन दिवसांत या कामांना मंजुरी द्या, रोहयो अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या कामांचा तालुकानिहाय आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
पाऊस पडण्यासाठी आणखी बराच कालावधी बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे. मागणी व आवश्यकतेनुसार नागरिकांना पाण्याचे टॅंकर मंजूर करण्यात यावेत. टॅंकरद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचा उद्भव गावापासून जवळच असेल याची खात्री करावी. पुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात यावी. तसेच टॅंकरच्या फेऱ्या योग्यरितीने होत आहेत किंवा नाही याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. दुष्काळी परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी दक्षतेने व गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
चारा छावणीला भेट व शेतकरी संवाद
पालक सचिव आशिषकुमार सिंह यांनी चास, सुपा येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांना भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधला. पशुधनाला चांगला सकस चारा मिळावा, यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. छावणीत दाखल होणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या जनावरांची छावणी चालकांनी नोंद ठेवावी. जनावरांना शासन निकषानुसार चारा, खुराक द्यावा. पिण्यासाठी पाणी उपलब्ध करावे. छावणीतील पशुपालकांची समिती स्थापन करावी. तसेच छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांचे टॅंगिंग करण्याबरोबरच छावणी चालकांनी पशुपालकांना कार्ड वितरीत करावे.