मागील नियम मोडीत : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र प्रवेश प्रक्रियेचा पॅटर्न
प्रवेशासाठी चार फेऱ्या
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ुुु.ारहरलशीं.ीेस या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना संपुर्ण माहितीसह कागदपत्रे अपलोड करायची आहेत. या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी सेतु सुविधा केंद्र दि. 7 जूनपासून सुरू करण्यात आली आहेत. तसेच जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर संकेतस्थळावर महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम व इतर माहिती भरायची आहे. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एकूण चार ऑनलाइन प्रवेश फेऱ्या राबविल्या जाणार आहेत.
पुणे – राज्यातील कृषी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी यावर्षीपासून केवळ “एमएचटी- सीईटी’तील गुणांवर प्रवेश दिले जाणार आहेत. यापूर्वी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये केवळ सीईटीच्या गुणांवर प्रवेश मिळत होता. आता त्याच धर्तीवर कृषी पदवी प्रथम वर्ष प्रक्रिया होणार आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. मागील वर्षी पहिल्यांदाच या प्रक्रियेत “कृषी’चा समावेश करण्यात आला.
पहिलेच वर्ष असल्याने “कृषी’साठी इयत्ता बारावीचे 30 टक्के व सीईटीचे 70 टक्के गुण ग्राह्य धरण्यात आले होते.
म्हणजे विद्यार्थ्याला इयत्ता बारावीला 70 टक्के गुण असतील, तर 30 टक्क्यांप्रमाणे त्याचे 21 गुण आणि सीईटीला 60 टक्के गुण असतील तर त्याचे 70 टक्क्यांनुसार 42 गुण एकत्रित करण्यात आले. त्यानुसार गुणवत्ता यादीच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. तर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी केवळ सीईटीचे गुण ग्राह्य धरण्यात आले. यावर्षी कृषीसाठीही सीईटीचेच गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून देण्यात आली.
इयत्ता बारावीचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नसले, तरी शेतजमीन (12 टक्के), इयत्ता बारावीतील व्यावसायिक विषय (10 टक्के), राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा स्पर्धा, वादविवाद, निबंध, वक्तृत्त्व या राज्यस्तरीय स्पर्धांचे (2 टक्के) गुण विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत. पुढील वर्षीपासून हे गुणही न देण्याबाबत विचार सुरू आहे. अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांना हे गुण मिळत नाहीत. कृषी पदवीमध्ये प्रवेशासाठी इयत्ता बारावी (विज्ञान) च्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण व खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किमान 50 टक्के गुण अनिवार्य आहेत.