एखाद्या पात्र सज्ञान व्यक्तीने केलेले ईच्छापत्र अथवा मृत्युपत्र केवळ त्याने पत्नी असुन शेजारच्या व्यक्तीच्या नावे केले म्हणुन त्याचे महत्व कमी होत नाही. त्याने नियमानुसार केलेले ईच्छापत्र ग्राह्यच मानावे लागेल असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने एका अपीलामधे व्यक्त केले आहे.
शेजाऱ्याच्या नावे केलेले ईच्छापत्र ग्राह्यच (भाग-२)
चार दिवसापूर्वी 28 मे रोजी शेवंताबाई विरुद्ध अरुण व ईतर या अपीलामधे न्या.एम.आर शहा व न्या. ए. एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निकाल देत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द केला. व उच्च न्यायालयाचा निकाल कायम केला. “दैनिक प्रभात”च्या कायदाविश्व पुरवणीत दीड वर्षापुर्वी (दिनांक 17/10/2017) “जेष्ठ नागरीकांचे अधिकार” या लेखात ईच्छापत्र/ मृत्युपत्रबाबत ते कोण करु शकतो, त्याचे महत्व व पद्धती यासंदर्भात माहीती घेतली होती. कुणीही सज्ञान व्यक्ती त्याने स्वकमाईने कमविलेल्या संपत्तीची विल्हेवाट लावु शकतो. एखादी स्त्री तिच्या स्त्री धनाची अथवा तिच्या हयातीत कमविलेल्या स्वकष्टार्जीत संपत्तीची विल्हेवाट लावु शकते तिला ईच्छापत्र अथवा मृत्यूपत्राद्वारे ती संपत्ती हस्तांतरित करण्याचा अधिकार असतो. एखादी मुक व्यक्ती अथवा अपंग व्यक्ती जिला परिणामाची जाणीव असते ती देखील ईच्छापत्रास पात्र असते. याबाबत सविस्तर माहीती पुर्वीच्या लेखात प्रकाशीत केली आहेच.