५ व्या योगा प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबिराचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : योग ही भारताने संपूर्ण जगाला आणि मानवतावादाला दिलेले सर्वांत मोठी देणगी आहे. संतुलित शरीर, मन आणि स्वास्थासाठी योग हा उत्तम असल्याचे दिसून आले आहे. योग या विषयातील प्राविण्य, योग विषयात घेतलेले प्रशिक्षण याचा उपयोग करुन भारतीय योग शिक्षकांनी योग प्रशिक्षण हा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून स्वीकारावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
के.सी. महाविद्यालयात पाचव्या योग प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबिराचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर, हैद्राबाद सिंद नॅशनल कॉलेजिअेट बोर्डाचे ट्रस्टी डॉ. निरंजन हिरानंदानी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
के.सी. महाविद्यालयात आयोजित 'योग प्रोटोकॉल' प्रशिक्षण शिबिराचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन. योग प्रशिक्षण हा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून स्वीकारण्याचे राज्यपालाचे योग शिक्षकांना आवाहन. कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित.#InternationalDayOfYoga2019 pic.twitter.com/y6wFagOkQx
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 17, 2019
राज्यपाल राव म्हणाले, गेल्या पाच वर्षापासून या महाविद्यालयात योग दिनाचे औचित्य साधून योगविषयक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे, याचा आनंद आहे. येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनी राज्यातील सर्वात मोठे विद्यापीठ असणाऱ्या मुंबई विद्यापीठामार्फत अधिकाधिक विद्यार्थी, योग शिक्षक, प्राध्यापक यांचा सहभाग मिळवून योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. आपल्या गुरुजनांनी ज्यांनी योग विद्या शोधून काढली, आत्मसात केली आणि त्याचा उपयोग मनुष्याच्या आयुष्य उंचावण्यासाठी केला अशांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे हे एक प्रकारे गौरवच आहे.
भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे की, २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस फक्त भारतातच नाही तर न्यूयॉर्क, लंडन, बिजिंग, टोकिओ, दक्षिण अफ्रिका आणि उर्वरित देशांमध्येही साजरा करण्यात येणार आहे. तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योगचा समावेश करणे आवश्यक असल्याचेही राज्यपाल राव यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
योग हा फक्त व्यायाम नसून योग म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहते हे दिसून आले आहे आणि त्यामुळेच आजच्या नागरिकांना विशेषत: तरुणांना आवाहन करतो की, योग आपली परंपरा असून ही परंपरा टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपण घेणे आवश्यक आहे. भारताची आजच्या घडीला सर्वांत मोठी शक्ती ही युवाशक्ती आहे. आज सर्वांत तरुण लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची ओळख बनली असून पुढील वर्षी भारताच्या लोकसंख्येचे सरासरी वय हे २९ वर्षे असणार आहे जे अमेरिकन आणि चीन राष्ट्रांपेक्षा ८ वर्षांने लहान असणार आहे. आजच्या युवकांना निरोगी आयुष्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्यांवर आधारित रोजगार मिळाल्यास येणाऱ्या काळात भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असेही राज्यपाल राव यांनी नमूद केले.