हिमांशू
घड्याळासारख्या वस्तूची एवढी चर्चा “थ्री इडियट्स’ चित्रपटानंतर बहुधा पहिल्यांदाच झाली असावी. तशी राजकीय घड्याळाची चर्चा अधूनमधून सुरू असते. आतासुद्धा घड्याळाचे काटे उलटे-सुलटे फिरवून “भाकरी फिरवण्याची’ चर्चा सुरू आहेच. परंतु चर्चेतले घड्याळ हे नव्हेच! सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे घड्याळ सध्या चर्चेत आहे. ते हरवले, नंतर सापडले. मधल्या काळात चोरीची तक्रार नोंदवली गेली, चौकशी झाली, झडत्या झाल्या… आणि अखेर चर्चा थांबली ती घड्याळाच्या किमतीवर! दमानिया यांच्या घड्याळाची किंमत आहे तब्बल पावणेदोन लाख रुपये.
औरंगाबादला काही कामानिमित्त त्या गेल्या होत्या. एका हॉटेलमध्ये मुक्काम करून सकाळी साडेनऊला त्या बाहेर पडल्या. दुपारी आपल्या हातात घड्याळ नसल्याची जाणीव त्यांना झाली. त्या पुन्हा हॉटेलमध्ये आल्या आणि घड्याळाबाबत चौकशी केली. घड्याळ सापडले नसल्याचे व्यवस्थापनाकडून सांगितले गेले. नंतर दमानिया यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून हॉटेलमधल्या पाच कर्मचाऱ्यांची चौकशी केली. हॉटेलमधल्या खोलीसह तिघांच्या घराचीही झडती घेतली; पण घड्याळ मिळाले नाही. अखेर ते लॉंड्रीत सापडले. हॉटेलमधल्या बेडशीटमध्ये अडकून ते लॉंड्रीत गेले होते. पण या घटनाक्रमापेक्षा घड्याळाच्या किमतीचीच चर्चा अधिक रंगली. सामाजिक कार्यकर्ते इतकी महागडी घड्याळं वापरतात, हे निदर्शनाला आणून देणारे समाजमाध्यमवीर जागोजागी दबा धरून होतेच!
याचदरम्यान, याच औरंगाबादेत “घड्याळ न पाहणाऱ्या’ मुलीने विक्रम नोंदवला, तो मात्र फारसा चर्चेत आलाच नाही. गीतांजली वारंगुळे नावाची शेतकऱ्याची मुलगी “एमएचटी-सीईटी’ परीक्षेत “सीईबीसी’ प्रवर्गातून राज्यात पहिली आली. ती मूळची बीड जिल्ह्यातली. औरंगाबादेत भाऊजींच्या घरी राहून तिने प्रवेशपूर्व परीक्षेसाठी कसून तयारी केली. घड्याळ न पाहता दररोज 12 ते 14 तास अभ्यास केला. आईवडील शेतात तीव्र दुष्काळाशी झुंजत असताना गीतांजली पुस्तकांमध्ये गढून गेली होती. दहावीला 98.20 टक्के आणि बारावीला 93 टक्के गुण मिळवणाऱ्या गीतांजलीने “एमएचटी-सीईटी’ परीक्षेत तब्बल 99.99 टक्के गुण मिळवले. विज्ञान, गणित अशा सगळ्याच विषयांमध्ये ती राज्यात टॉपर ठरली. सकाळी लवकर उठून नियमित अभ्यास, दुपारी क्लास आणि संध्याकाळी पुन्हा अभ्यास. सतत वाचन, नोट्स आणि सराव…
घड्याळाचा वापर फक्त क्लासची वेळ झाली, हे कळण्यासाठी! छोट्या शेतकऱ्यांच्या घरची परिस्थिती लपून राहिलेली नाही. कुटुंबाचे पालनपोषण करतानाच बळीराजा थकून जातो. पण शिक्षणाची जिद्द असलेली मुले असंख्य शेतकऱ्यांच्या घरात आहेत. परिस्थितीशी झगडून ती जगात आपले स्थान निर्माण करू पाहताहेत. दुष्काळाच्या झळा आणि आईवडिलांचे श्रम पाहताना सकारात्मक विचार करून गीतांजलीने जिद्दीने राज्यात नाव कमावले.
वरील दोन्ही घटना एकाच शहरात घडलेल्या; पण किंमत घड्याळाला नसते तर वेळेला असते, याचे भान देणाऱ्या. अंजली दमानियांचे घड्याळ ही मीडियासाठी “स्टोरी’ असते; पण गीतांजलीची “वेळ’ हा आपल्यासाठी “धडा’ असतो. आयुष्यात येणारी सगळ्यात वाईट वेळ हीच वस्तुतः सगळ्यात चांगली वेळ असते; कारण ती आपल्याला बरंच काही शिकवते, वास्तवाचे भान देते आणि कार्यप्रवण करते. उदाहरण समोर असताना महागडी घड्याळं महत्त्वाची की वेळ? ज्याचा-त्याचा प्रश्न!