ऑपरेटर नसल्याचे कारण सांगून ग्रामस्थांची पोस्ट ऑफीसकडून बोळवण
मलकापूर पालिकेतर्फे नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन
औंध – औंध व पंचक्रोशी गावातील लोकांना आधार कार्डसाठी भटकंती करण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे. प्रशासनाच्या या योजनेत महा ई-सेवा केंद्र असो वा सरकारी पोस्ट ऑफिस असो त्या ठिकाणी ज्या सुविधा मिळाव्यात त्या मिळत नसल्याने लोकांना भटकंती करावी लागत आहे.
आधार कार्ड हे महत्त्वपूर्ण कार्ड असून कोणत्याही नोंदी करण्यासाठी व कोणत्याही प्रशासकीय कामासाठी लागणारी गोष्ट म्हणजे आधार कार्ड आणि आधार कार्ड मिळवणे व त्यातील चुका दुरुस्त करणे ही अत्यंत कसरतीची गोष्ट ग्रामीण भागात दिसून येत आहे. औंधमध्ये कोणत्याही ठिकाणी आधार कार्ड सुविधा सुरू नसल्यामुळे गेले अनेक महिने लोकांना आपले काम व्यवसाय सोडून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी लोकांना तीन- चार हेलपाटे घातल्याशिवाय आधार कार्ड मिळत नसल्यामुळे लोकांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकांच्या आर्थिक देवाणघेवाणीसाठी पॅन कार्ड महत्वपूर्ण मानले जात असल्याने पॅन कार्ड काढण्यासाठी बॅंक अकाऊंट काढण्यासाठी तर चालू शैक्षणिक प्रवेश घेण्यास विद्यार्थी वर्गांस शैक्षणिक कामासाठी आधार कार्डची आवश्यकता असते.
त्या अनुषंगाने आधार कार्ड काढण्यासाठी तर काही लोकांचे आधार कार्डमधील झालेल्या चुका सुधारण्यासाठी पळापळ सुरू आहे. शासकीय कामासाठी आधार कार्ड सक्तीचे असेलच तर आधार कार्ड बनवणारी केंद्र सुरू ठेवणे हेहीे सक्तीचे असायला हवे अशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली आहेत. अनेक वेळा पोस्टात जाऊनसुद्धा तेथील अधिकारी आधार कार्ड देण्यासाठी ऑपरेटर नसल्याचे सांगून ऑपरेटर आल्यानंतर सुरू करू अशी ग्वाही देत आहेत. औंध पोस्ट ऑफिसमधील पदाधिकारी वेळ काढून नेत असल्याचे ग्रामस्थांना निदर्शनास येऊ लागले संताप व्यक्त होऊ लागला आहे.