नवीन योजना सरकारकडून तयार करण्यात येणार
नवी दिल्ली : वर्षाला बॅंक खात्यात ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी आता फक्त पॅनकार्ड चालणार नाही. तर ठराविक रक्कम बॅंक खात्यात जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य होणार आहे. कारण, यासंबंधीची नवीन योजना सरकारकडून तयार करण्यात येत आहे. व्यवहारातील नोटांचा वापर कमी करून काळ्या पैशाला आळा घालावा याही उद्देशाने सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
प्रस्तावित आर्थिक विधेयकानुसार, अनेक मोठ्या व्यवहारांची मर्यादासुद्धा वाढवण्यात येणार आहे. जास्तकरुन विदेशी चलन खरेदीची मर्यादा वाढवली जाणार आहे. यासाठी आतापर्यंत फक्त पॅनकार्डची माहिती घेतली जात होती. याप्रमाणे एखाद्या ठराविक संपत्तीचा व्यवहार करताना केवळ आपल्याला पॅनकार्ड किंवा आधारकार्ड देण्याची गरज नाही, तर संपत्तीच्या नोंदणीवेळी आधारचे प्रमाणीकरण करणे गरजेचे असणार आहे.
एका सरकारी सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, लहान व्यवहार करणाऱ्यांना काही अडचणी येणार नाहीत आणि फक्त ठराविक रकमेपेक्षा जास्त व्यवहार करत आहेत, त्यावर मर्यादा घालण्यासाठी याप्रकारची योजना आखली जात आहे. यानुसार आधार प्रमाणीकरण अनिवार्य केल्यामुळे 10 ते 25 लाखांपर्यंची रक्कम बॅंकेत जमा केल्याचे किंवा काढल्याचे समजून येईल. सुत्रांनुसार, बॅंक खात्यात पैसे जमा करताना काही जणांकडून नकली पॅनकार्डचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे व्यवहारांसंबंधी माहिती मिळत नाही. हा व्यवहार विश्वासार्ह दिसून येत नाही. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी व्यवहार करताना आधार प्रमाणीकरण केल्यास यासंबंधी माहिती मिळण्यास मदत होईल.