जुना बेबी कालवा ओलांडताना चालकांची कसरत
उरुळी कांचन – उरुळी कांचन ते डाळींब रस्त्यावर असणाऱ्या तसेच हवेली व दौंड तालुक्याला जोडणारा पांढरस्थळ वस्तीवरील जुन्या बेबी कालव्यावरील पूल मोडकळीस आला आहे. पूल ओलांडताना चालकांना कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका असल्याने या पुलाचे काम त्वरीत करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन व सुनील कांचन यांनी केली आहे.
हवेली तसेच दौंड तालुक्याला जोडणारे उरुळी कांचन येथील डाळींब रस्त्यावरील पांढरस्थळ हे ठिकाण आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या बनात हा रस्ता जातो. बोरी, ताम्हणवाडी, शिंदवणे, वळती यासह दौंड व पुरंदर तालुक्यात जाण्याकरिता याच रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने वर्दळ कायम असते. मात्र, येथील जुन्या बेबी कालव्यावरील पुलाची दुरवस्था झाली असून तो केंव्हाही कोसळू शकतो, यामुळे येथे नवा पूल उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीसह डाळींब, उरुळी कांचन परिसरातील नागरिकांनी केली आहे.
डाळींब येथे असणाऱ्या विठ्ठलबन आषाढी एकादशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते, त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, या करीता या पुलाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी विठ्ठल देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनीही केली आहे. तर, याबाबत बांधकाम विभागाला अनेकवेळा निवेदने देण्यात आली असून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन व सुनील कांचन यांनी सांगितले.