मुंबई – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीमुळे चांगलाच फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे पदरात पडलेले अपयश विधानसभा निवडणुकांमध्ये भोगावे लागू नये यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा जोरदार प्रयत्न सुरु झाला आहे. याबाबत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्यासाठी प्रयत्न करणारा असून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची जबाबदारी काँग्रेसतर्फे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीबाबत प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एक पाऊल मागे घेतल्याचं चित्र पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकांवेळी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व मित्रपक्षांच्या नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख भाजपची ‘बी’ टीम असा करण्यात आला होता. याबाबत अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण देताना लोकसभा निवडणुकांवेळी वंचित बहुजन आघाडीवर केलेली ‘ती’ टीका राजकीय असल्याचे म्हंटले.