केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची माहिती
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत चकमकीत 963 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर 413 सुरक्षा जवान शहीद झाले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली. 2014 च्या सुरुवातीपासून ते जून 2019 पर्यंतची ही आकडेवारी असल्याचे जी. किशन रेड्डी यांनी म्हटले. दहशतवाद कदापि खपवून घेतला जाणार नाही हे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यादृष्टीने दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलांकडून कडक कारवाई करण्यात येत असल्याचे रेड्डी यांनी म्हटले.
सीमेपलीकडून भारतात विशेषत: जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न होत असतात. घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने बहुस्तरीय धोरणाची अंमलबजावणी केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या प्रदेशांमध्ये विकासाची कामे हाती घेणे, कुंपण उभारणे, सुरक्षा जवानांना अत्याधुनिक शस्त्रे देणे, गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करणे असे अनेक उपाय योजण्यात आले असून त्याचे योग्य परिणामही दिसत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.