राहाता: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत मुदतीत पीकविमा भरुनही शेतकऱ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.ऐन टंचाईच्या काळात विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या 8 हजार 462 शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक भुर्दडांचे गांभिर्य लक्षात घेवून या शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या कृषी आयुक्तांकडे केली आहे.
या संदर्भात कृषि आयुक्त सुहास दिवसे यांना विखे पाटील यांनी आकडेवारीसह पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून 10 हजार 19 कर्जदार आणि 7 हजार 956 बिगर कर्जदार अशा 17 हजार 975 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पुर्नरचीत हवामान आधारित फळपीकविमा योजनेत सहभाग घेवून 7 कोटी 55 लाख 62 हजार रुपयांचा विमा हप्ता भरणा केला होता. मात्र कर्जदार शेतकऱ्यांपैकी फक्त 9 हजार 448 शेतकऱ्यांनाच विमा रकम मंजुर झाली. यापैकी 571 शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांपैकी फक्त 65 शेतकऱ्यांना विमा रकमेचा लाभ मिळाला असल्याने आजही 8 हजार 462 शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहिले असल्याचे विखे पाटील यांनी कृषि आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिली.
वास्तविक बॅंकेने पाठविलेली विमा हप्ता रकम विमा कंपनीने स्विकारलेली असून या संदर्भात केंद्र व राज्य सरकारलाही कळवले आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याची रक्कम एकाच वेळी जिल्हा बॅंकेने दिलेली असताना 65 बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा कंपनीने लाभ दिलेलाच आहे ही बाब ना.विखे पाटील यांनी कृषि आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. आर्थिक टंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत विमा हप्ता भरलेला आहे. शेतकरी दुष्काळाच्या सुलतानी संकटाचा सामना करत असताना त्यांना विमा रकम देवून मदत करण्याची आवश्यकता असुन, सर्व शेतकरी विमा भरपाई मिळण्यासाठी पात्र असताना त्यांना लाभापासून वंचित ठेवणे अयोग्य आहे. याबाबत गांभिर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांना विमा भरपाई रक्कम मिळवून द्यावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी ना.विखे पाटील यांनी केली आहे.