पारनेर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेडमधून मताधिक्य घटले
नगर – सन 2014 च्या लोकसभा निवडणूक माजी खासदार दिलीप गांधी यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जास्त 72 हजार 352 एवढे मताधिक्य या लोकसभा निवडणूकीत डॉ. सुजय विखे यांना मिळाले. विशेष म्हणजे सन 2014 च्या निवडणुकीत गांधी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून 11 हजार 779 मतांनी पिछाडीवर होते. परंतू यावेळी विखे मात्र तब्बल 25 हजार 170 मतांची आघाडी मिळविली आहे. अर्थात विखेंना या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा तब्बल 60 हजार 698 मताधिक्य मिळाले आहे. सन 2014 मध्ये गांधींना सर्वाधिक मताधिक्य श्रीगोंदा मतदारसंघातून 58 हजार 254 इतके मिळाले होते. परंतू विखेंना या मतदारसंघातून 30 हजार 592 मताधिक्य मिळाले आहे. म्हणजे गांधीपेक्षा या मतदारसंघातून विखेंना तब्बल 27 हजार 662 मताधिक्य कमी मिळले आहे.
कर्जत-जामखेड या पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील विखेंचे मताधिक्य घटले आहे. गांधींना 41 हजार 179 मताधिक्य मिळाले होते. आता या निवडणुकीत विखेंना 24 हजार 673 एवढे मताधिक्य मिळाले. म्हणजेच गांधींपेक्षा 16 हजार 505 मताधिक्य घटले आहे. पारनेरमध्ये देखील 4 हजार 378 एवढे मताधिक्य कमी झाली आहे. गांधींना 41 हजार 87 मताधिक्य मिळाले होते. आता या निवडणुकीत विखेंना 36 हजार 709 मताधिक्य मिळाले आहे. मात्र नगर शहर व राहुरी विधानसभा मतदारसंघातून गांधींपेक्षा विखेंना जास्त मताधिक्य मिळाले आहे.
राहुरीमध्ये गांधींना 41 हजार 401 मताधिक्य मिळाले होते. यावेळी विखेंना तब्बल 71 हजार 803 एवढे मताधिक्य मिळाले असून त्यांनी गांधींपेक्षा 30 हजार 402 एवढे जास्तीचे मताधिक्य मिळविले आहे. नगर शहरात गांधींना 38 हजार 265 मताधिक्य मिळाले होते. त्यात वाढ होण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली होती. शहरात शिवसेनेने जोरात प्रचार करून विखेंना मदत करण्याचा प्रयत्न केला. विखेंना 52 हजार 622 एवढे मताधिक्य मिळाले होते. ते गांधींच्या मताधिक्यापेक्षा 14 हजार 357 मतांनी जास्त आहे.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून गांधींना मताधिक्य मिळाले नव्हते. ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांला मिळालेल्या मतापेक्षा 11 हजार 779 मतांनी पिछाडीवर होते. गांधींना हा मतदारसंघ वगळता तर उर्वरित सर्वच मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. परंतू विखेंना सर्वच विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघातून विखेंना 60 हजार 698 मताधिक्य मिळाले आहे. ते सन 2014 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतापेक्षा तब्बल 25 हजार 170 मतांनी जास्त आहे.