जास्तीत-जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याची गरज
नवी दिल्ली – सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 91 जागांसाठी मतदान झाले तर दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 97 जागांसाठी मतदान झाले. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करीत आहे.
देशातील पहिली लोकसभा निवडणूक 1952 मध्ये झाली. यासाठी 10 कोटी 45 लाख रुपयांचा खर्च आला होता. तर 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 3870 कोटींचा खर्च आला होता. आता सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास 6500 कोटी खर्च होण्याची शक्यता आहे.
पहिल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारामागे 0.60 पैशांचा खर्च आला होता. तर 2014 मध्ये हाच खर्च 46 रुपयांपर्यंत पोहोचला होता. 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारामागे 72 रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. मतदान न करता तुम्ही स्वत:सह देशाचेही नुकसान करत आहात. अशाच पद्धतीने जर एका मतदारसंघात 1000 लोकांनी मतदान केले नाही तर 72 हजारांचे नुकसान होते.
आजही आपल्या देशात कोट्यवधी लोक संधी असतानाही मतदान करत नाहीत. हिशेब केला तर आकडा एका नजरेत वाचता येणार नाही एवढा होईल आणि हे नुकसान फक्त मतदान न केल्यामुळे आपल्या देशाला सहन करावे लागते.
अनेक वेळा मतदार माझ्या एकट्याच्या मतदानाने काय होणार, असा विचार करून मतदानाला जात नाही. काही तर सुट्टी असते म्हणून मजामस्ती करण्यासाठी मतदान न करता फिरायला जातात. परंतु तुम्ही मतदान न केल्याने स्वत:चेच नाही तर देशाचे देखील नुकसान होते हे माहिती आहे का?